श्रीश्वासम्

हिंदी    

गुरुवार, दिनांक ०७-११-१३ रोजीच्या प्रवचनात सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी ‘श्रीश्वासम्’ उत्सवाबद्दल महत्वाची माहिती दिली. जानेवारी २०१४ मध्ये ‘श्रीश्वासम्’ हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. ‘श्रीश्वासम्’चे मानवी जीवनातील महत्वही बापुंनी प्रवचनात सांगितले. सर्वप्रथम "उत्साह"बद्द्ल बोलताना बापू म्हणाले, "मानवाच्या प्रत्येक कार्याच्या, ध्येयाच्या पूर्ततेसाठी उत्साह सर्वांत महत्त्वाचा असतो. उत्साह मनुष्याच्या जीवनाला गती देत राहतो. एखाद्याजवळ संपत्ती असेल परंतु उत्साह नसेल तर काहीही उपयोग नाही. मग हा उत्साह आणायचा कुठून? आज आपण बघतो की सगळीकडे अशक्तपणा जाणवतो. शरीरातला ९०% अशक्तपणा हा मानसिक असतो. पण आपण प्रत्येकाने स्वत:ला विचारायला हवं की, खरंच आम्ही एवढे दुबळे, अशक्त आहोत का? आपली ही परिस्थिती का होते? आपण आपल्या जीवनाचा काय विकास केला? आपण प्रयत्नपूर्वक आपल्या एका तरी चांगल्या गुणाचा अधिक विकास करण्यासाठी, तो गुण वाढविण्यासाठी अपरंपार श्रम घेतलेत का? ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट - माझ्या जीवनात लहानपणी जी स्वप्न पाहिली होती त्यातलं एक तरी पूर्ण होण्यासाठी मी योजना तयार केली का? तिसरी गोष्ट - मी कोणातरी माणसाला, जो नातेवाईक, मित्र नाहीए, अशा एखाद्या व्यक्तीला केवळ माणुसकीच्या खातर सहाय्य केलयं का? जी व्यक्ती माझी कोणी नातेवाईक, मित्र लागत नाही त्या व्यक्तीसाठी आम्ही शरीरं झिजवलयं का? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या देवाने माझ्यासाठी एवढं केलं, त्या देवासाठी आम्ही काही केलंय का? मग कोणी म्हणेल तो देवच तर आमच्यासाठी सगळं काही करत असतो, तोच सगळं देत असतो, आम्ही त्याच्यासाठी काय करणार? पण तुम्हाला माहीत पाहिजे की देवाला तुमच्याकडून ह्याच तीन गोष्टी हव्या असतात. ह्या चण्डिकापुत्राला ह्याच तीन गोष्टींची अपेक्षा असते."

Untitled-12

उत्साहाला संस्कृत शब्द आहे - मन्यु. मन्यु म्हणजे जिवंत, रसरशीत, स्निग्ध उत्साह. शरीरातील प्राणांच्या क्रियेला मनाची आणि बुद्धीची उचित साथ मिळवून देऊन कार्य संपन्न करणारी शक्ती म्हणजे उत्साह. चण्डिकाकुलाकडून, श्रीगुरुक्षेत्रम् मन्त्रामधून हा उत्साह मिळतो. भगवंतावरील विश्वासातून हा उत्साह मिळतो. ‘मानवाचा भगवंतावर जेवढा विश्वास, त्याच्या शतपटीने त्याच्यासाठी त्याचा भगवंत मोठा’ असे मानवाच्या बाबतीत असते. आणि हा विश्वास आणि उत्साह पुरवणारी गोष्ट म्हणजे ‘श्रीश्वासम्’. मानव एरवी अनेक कारणांसाठी प्रार्थना करतो, पण भगवंतावरील आपला विश्वास वाढावा म्हणून प्रार्थना करणे महत्वाचे असते. भगवंतावरील विश्वास वाढवणारी आणि प्रत्येक पवित्र कार्यासाठी उत्साह पुरवणारी गोष्ट आहे ‘श्रीश्वासम्’!"

श्रीश्वासम् उत्सवाबद्दल बोलताना बापू पुढे म्हणाले, "जानेवारी २०१४ मध्ये पहिले श्रीश्वासम् हे उत्सवस्वरूपात मोठ्या उत्साहात साजरे केले जाईल. त्यानंतरच्या प्रत्येक गुरुवारी श्रद्धावानांना श्रीहरिगुरुग्राम येथे श्रीस्वस्तिक्षेम संवादानंतर श्रीश्वासम् करता येईल. श्रीश्वासम् उत्सवाच्या तयारीसाठी उद्यापासून (म्हणजे ०८-११-२०१३ पासून) मी स्वत: उपासना करणार आहे. ह्या ‘श्रीश्वासम्’ साठी मी एक व्रत घेतोय जेणेकरून ज्याला ज्याला हा श्रीश्वासम् हवाय त्या प्रत्येकाला तो मिळावा. ह्या व्रताच्या काळात मी दर गुरुवारी येणारच आहे. श्रीश्वासम् साठी मला माझी तयारी करायची आहे. मला प्रत्येकासाठी असे चॅनल open करायचे आहे, की ज्याच्यामुळे प्रत्येकाला त्याच्या कुवतीनुसार, स्थितीनुसार ते वापरता यायला पाहिजे. ही माझी साधना आहे, उपासना आहे. श्रीश्वासम् मध्ये सामील होऊ इच्छिणा-या प्रत्येकाला पहिल्या दिवसापासूनच याचा पुरेपूर लाभ घेता यावा, यासाठीची तयारी म्हणजे माझी ही उपासना असेल. प्रत्येक श्रद्धावानाला श्रीश्वासम् पासून मिळणारी ऊर्जा ग्रहण करता यावी, यासाठी चॅनल्स उघडण्याच्या कार्यासाठी ही उपासना असेल".

ह्या व्रताच्या काळात श्रद्धावानांनी मातृवात्सल्य उपनिषद मध्ये दिलेली ‘श्रीशिवगंगागौरी-अष्टोत्तरशत-नामावली:’ जेवढा वेळा वाचता येईल तितक्यांदा प्रेमाने वाचायची आहे. ह्यामध्ये कुठलाही नियम धरू नका. ही अष्टोत्तरशतनामावली म्हणून झाली की मोठ्या आईजवळ प्रार्थना करायची, "आई, माझा जो चॅनल बापूंना बनवायचा आहे, त्याच्यासाठी ह्या नामावलीचा माझ्यासाठी उपयोग करून घे."

ह्या श्रीश्वासम् उत्सवाची सविस्तर माहिती स्वत: बापू श्रीहरिगुरुग्राम येथे उत्सवाच्या आधी एखाद्या गुरुवारी देतील आणि त्याबाबत सर्वांना अगोदर सूचित करण्यात येईल.

ह्या उत्सवाची माहिती देताना बापू पुढे म्हणाले, "आतापर्यंतच्या प्रवचनात आपण जी सगळी आईची सूत्रं (अल्गोरिदम्स) पाहिली, ती अल्गोरिदम्स एकत्रित करणारी ही गोष्ट आहे. ह्या उत्सवासाठी एक थीम आहे. ती थीम म्हणजे ह्या उत्सवासाठी सगळ्यांनी घरी चिनी मातीपासून म्हणा, क्लेपासून म्हणा, साध्या मातीपासून म्हणा मूषक बनवायचा. मूषक का ? तर स्वत: आदिमाता श्रीविद्येने दिव्य मूषकाला ‘श्रद्धावानाचा श्वास’ म्हणून संबोधले आहे. प्रत्येकाने उत्सवाच्या दिवशी येताना, त्या दिवशी घरी सकाळी उठल्यावर एका तासाच्या वेळेत उंदीर बनवायचा. एका तासात छोटे-छोटे कितीही उंदीर बनवा किंवा एक मोठा उंदीर बनवा. तो एक तास ही महत्त्वाची गोष्ट आहे. तो मूषक प्रत्येकाने आपल्याबरोबर इथे घेऊन यायचा आहे. ही थीम फक्त पहिल्या दिवसासाठीच आहे. नंतरच्या गुरुवारी श्रीश्वासम् साठी मूषक बनवून आणायचा नाही. उत्सवाच्या वेळी आणताना समजा तुम्ही बनवलेला मूषक तुटला तरी त्याची जबाबदारी तुमची नाही, ती माझी असेल.

तसेच उत्सवाचा ड्रेस कोड असा आहे की प्रत्येकाने त्यादिवशी स्वत:च्या हाताने धुतलेले कपडे घालायचे. निदान अंगावरचे एक तरी वस्त्र स्वत:च्या हाताने धुतलेले असायला हवे. अशा वस्त्राला ‘धौत वस्त्र’ म्हणतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्सवाच्या दिवशी स्वत:ला available करून ठेवा."

उत्सवाची तारीख निश्चित झाल्यावर सर्वांना त्याबाबत ह्या ब्लॊगवरून सूचित करण्यात येईल. तसेच श्रीश्वासम् बद्द्ल परमपूज्य बापू ज्या गुरुवारी सविस्तर प्रवचन करणार आहेत, ती तारीखही ह्या ब्लॊगवरून आगाऊ कळविण्यात येईल.

मला खात्री आहे की माझे सर्व श्रद्धावान मित्र ह्या उत्सवाची आतुरतेने मनापासून वाट पाहतील.

हरि ॐ

श्रीराम

मी अंबज्ञ आहे